Showing posts with label अमृतधारा. Show all posts
Showing posts with label अमृतधारा. Show all posts

20 May 2025

                                         🌸 श्रीराम समर्थ 🌸

    अमृतधारा  २२२

 सहवासाने प्रेम येते. घराचे माणसांचे सहवासाने प्रेम येते. थोडे एकत्र राहून प्रेम येते. सहवास बळजबरीने करता येईल. संगतीने प्रेम आल्याशिवाय राहणार नाही.

 

आपल्याला आपलेपणाचे प्रेम नाही. बायकोत/नवर्यात आपलेपणा असतो तसा भगवंताबद्दल आपलेपणा नाही.

 

भगवंताच्या प्रेमाला जातीची, वयाची, परिस्थितीची अडचण नाही. आपण प्रेम वाढवीत नाही. अवडंबर वाढवतो. भगवंताच्या प्रेमाविना लिहिणारा, वाचणारा ऐकणारा फुकट आहे.

 

आपण भगवंताची पूजाअर्चा करतो पण तो माझा आहे असे वाटत नाही. भगवंतावर मुलाइतके आपले प्रेम नाही. मुलासारखा भगवंत वाटला पाहिजे.

 

भगवंताजवळ नेहमी राहणारे त्याच्याहून वेगळे राहणारे आमच्या हातात असणारे असे एक  नाम आहे. नामाने भगवंताचा सहवास होतो.

 

भगवंता करताच नाम घेतले तर त्याच्या सहवासाचे प्रेम येईल.

 

आशीर्वाद

🌷🌿🌷

श्रीराम समर्थ


 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - २२१


भगवंताचे प्रेम लागले की सर्व उमजेल. ते प्रेम निर्माण व्हायला सर्व त्याग लागतो. तो आपल्या हातात नाही. आपल्या हातात एकच उपाय आहे. तो म्हणजे सहवास.


सहवासाचे प्रेम मोठे आहे. उद्धवाला सोडताना भगवंताच्या डोळ्यात पाणी आले. 


सहवास कृती आहे. वृत्ती बनवायची आहे.


स्मरण कृती आहे. विस्मरण वृत्ती आहे.


सहवास कसा करावा? जोडणारी वस्तू दोन्ही ठिकाणी असावी. उदाहरणार्थ  पतंगाची दोरी. भगवंताचे नाम तसे आहे.


भगवंताच्या लीला अगाध आहेत. त्यातील त्याच्या रुपाची कल्पना येणार नाही. निरनिराळ्या प्रसंगी त्याने निरनिराळी रुपे घेतली. न बदलणारे असे नामच आहे.


नाम तो सोडू शकत नाही, ते आपल्या जवळही आहेच. म्हणून आपण नामात रहायला शिकावे.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

19 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २२०


दृश्यात सुख नाही. अदृश्यातील सुख ज्यांनी अनुभवले त्यांच्यावर विश्वास ठेवावा. संतानी भगवंत सांगितला, त्याला धरावे.


डाॅक्टरवर विश्वास ठेवून आपण औषध घेतो. तसे संतांवर विश्वास कां ठेवू नये?


दृश्यात सुख नाही म्हणून अदृश्यात शोध जरूर आहे. दृश्याच्या बुडाशी अदृश्य आहे, अदृश्याची (भगवंताची) तळमळ लागली पाहिजे.


बुद्धी गहाण ठेवू नका. पण ती शुद्धीवर नाही म्हणून सांगावे लागते. बुद्धीने ठरवा व पटल्यानंतर तरी त्याप्रमाणे करा.


अनन्य शरणागतीशिवाय दुसरा मार्ग नाही.


काय करावे हे सांगितले. त्याने त्याचा परिणाम व्हावासा वाटेल. पण  केल्याशिवाय होणार नाही.


शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे. ह्याचाच अर्थ उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाची संगत केली पाहिजे जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - २१९


भगवंताकरता आपण आहोत असे म्हणावे. त्याच्याकरता आपण जगलो म्हणजे कार्य झाले.


आम्हीच परमार्थाला तयार पाहिजे. ते नसेल तर सर्व निरुपणें ऐकून उपयोगी नाही. थोडी कृती सुद्धा उपयोगी पडते.


थोडा तरी नेम करावा. तो फार असू नये. पण त्यात अर्थ असावा. नेम भगवंताच्या नामस्मरणाचा असावा.


नामाने भगवंताच्या भक्तीची वासना उत्पन्न होईल.


जरुरीपुरते सात्विक अन्न व दुसऱ्याच्या अंतःकरणाला धक्का न लागेल असे वागणे व बोलणे असावे.


ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ गाठला. निंदा करू नये. ज्या मुखाने भगवंताचे नाम घेतो त्याने परनिंदा करू नये.


ज्याने भगवंताचे स्मरण होईल असा नियम असावा.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


  अमृतधारा - २१८


प्रत्येकाला काहीतरी गोष्टीची उणीव आहेच, त्यामुळे त्यास समाधान नाही हा अनुभव आहे.


मला काहीतरी पाहिजे. माझ्यातील असमाधानाचे मूळ त्यात आहे. माझे असमाधान आहेच. त्याचे फक्त कारण बदलते.  म्हणूनच ते कारण खरे नाही.


ते खरे कारण शोधले पाहिजे. त्यासाठी भगवंताने बुद्धी दिली आहे.


आम्हाला तात्पुरते समाधान पाहिजे. पण त्यातील घात (नुकसान) समजले तर तळमळ लागेल. भगवंताची नड लागली पाहिजे.


दृश्याची तळमळ असताना आम्ही त्यातच आयुष्य घालवतो. मग भगवंताची तळमळ लागल्यावर का होणार नाही? आम्हाला भगवंताची खरी तळमळ नाहीच. ती व्हावी (लागावी) असे त्याच्यापाशी मागावे.


आता समजून करायला लागले की समजते.


भगवंताची भूक लागायला नामस्मरण आवश्यक आहे.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

16 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - २१७


प्रपंचाहून परमार्थ वेगळा वाटतो, हे खरे नाही. त्यात कृतीत फरक नाही. वृत्तीत फरक आहे.


प्रपंचातल्या गोष्टी न करणे, त्याहून काहीतरी वेगळे करणे हा परमार्थ नाही. सामान्य मनुष्य करतो त्याच गोष्टी साधू करतो.


ज्याचे  महत्त्व जितके तितकेच त्याला द्यावे. प्रपंचाला फार महत्व दिले गेले. प्रपंचात पुरेसे वाटतच नाही.


"माझ्या मुळे प्रपंच चालतो" हे म्हणणे हा प्रपंच. "भगवंतामुळे होते" हे म्हणणे हा परमार्थ.


कर्तेपणा आपल्याकडे घेणे हा प्रपंच. तो भगवंताकडे देणे हा परमार्थ.


चांगली माणसे केलेले सांगत नाहीत. तीच खरी चांगली माणसे. पण त्याच्या पलीकडे नाम आहे. ते इतके चांगले आहे की ते केलेले कळत नाही.


 आशीर्वाद

🌹🌹🌹

15 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ🌸


    अमृतधारा - २१६


प्रयत्न करावा पण भगवंत ठेवील तसे रहावे. असे राहील तो परमार्थी खरा व तोच समाधानी होईल. यात जे भूषण आहे ते वैभवात नाही.


वैभव मिळाले तरी भुलू नये. कमी जास्त गोष्टींचा परिणाम होऊ देऊ नये.


प्रयत्न करावा पण जे फळ समाधान बिघडवते ते भगवंतावर सोपवावे. फळाची अपेक्षा ठेवली हेच कारण निर्माण करणे आहे.


समाधानाला कारण निर्माण करणे दुःखाचे होते. आपण कारणामागे जाता उपयोगी नाही. 


समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.


प्रयत्नानंतर फळ आले वा न आले दोन्ही वाहवा. 


फळाला जास्त महत्व दिले म्हणून समाधान बिघडले.


आपले खरे काम भगवंत मिळवणे आहे आणि त्यासाठी नामस्मरण पाहिजे.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २१५


समाधान कशाने, तर त्याला कारण नाहीच. असमाधानाला कारण आहे. प्रकृती स्वभावतः चांगली. ती बिघडायला कारण लागते. तसे समाधानाचे आहे. समाधान बिघडणे वृत्तीचे मर्म आहे. हे समजले तर परमार्थ तितका अवघड नाही.


असा विचार करायला पाहिजे की अशी कोणती गोष्ट आहे की जी मिळाल्याने अखंड समाधान मिळेल?


प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय, प्रत्येकाचा हेतू अखंड समाधान हा आहे. तो हेतू ठरवला पाहिजे.


समाधान ही भगवंताची खूण आहे. भगवंतावाचून ईतरांकरता केले तर व्यवहारिक समाधान मिळेल. पण ते शाश्वत नाही.


समाधानाला तीन गोष्टी हव्या.

     १) सदाचरण.

     २) अंतःकरणाचे पावित्र्य.

     ३) अखंड नामस्मरण.


समाधानाला कशाचीही गरज नाही. प्रत्येकाचा प्रयत्न समाधानासाठीच आहे. समाधान अखंड टिकण्याकरता अखंड नाम घ्यावे.


  आशीर्वाद

 🌹🌹🌹

13 May 2025

 🌸श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २१४


आपले एक साध्य व त्याला अनुकूल साधन असावे. ते साधन आपल्या स्वाधीन असावे.


ध्येय ठरल्याशिवाय साधन आनंद देणार नाही आणि साधनात आनंद नसेल तर चिकाटी राहणार नाही!


परमार्थात निरनिराळे लोक काहीतरी सांगत असतात. मनुष्याने गोंधळता उपयोगी नाही. लोक गोंधळून टाकतात.


गोंधळाचे कारण नाही. पण अनुभव नाही तेच गोंधळ करतात.


परमार्थ हा सगळ्यांकरता आहे. अडाण्यापासून ते विद्वानापर्यंत व म्हणून तो सोपा असला पाहिजे. पण तो समजून केला तर.


आपले साध्य - आनंद, शांति, समाधान. त्यात मुख्य - आनंद.


आनंदाला कारण नाही. दुःखाला कारण आहे. मग कारण उत्पन्न करून दुःख का करावे?


प्रपंच आनंदरूप करणे हाच परमार्थ.


  आशीर्वाद

  🌹🌹🌹

12 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २१३


राम कर्ता ही भावना ठेवावी. कर्तेपण नको. त्यात खरे बंधन आहे. ते बंधन लटके आहे असा अनुभव येतो.


त्यासाठी तीन गोष्टी लागतात.


☆ सदाचरण व नीती यांचा पाया बळकट असावा.

☆अंतःकरणाची  पवित्रता - प्रपंच सोडणे कठीण म्हणून निस्वार्थता असावी.

☆भगवंताचे अनुसंधान असावे.

भगवंत सुसाध्य व सोपा आहे. म्हणून त्याचा मार्गही एकच आहे. तो म्हणजे नाम. भगवंत कितीही दूर असू दे. त्याचे नाम मुखात असेल तर तो पतंगासारखा जवळ आहे.


काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी एकाच चौकटीतून शिरावे लागते. त्याचप्रमाणे भगवंताचे दर्शन घेण्यासाठी शरणागती हा एकच मार्ग आहे.


शरणागतीला नाम हा एकच उपाय आहे.


  आशीर्वाद

  🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २१२


पेढा कसा खावा याला नियम नाही. तसे परमात्मा कसा भजावा यालाही नियम नाही.


जगात भगवंत प्राप्तीची अनेक साधने सांगतात. शरीरात वेगळे अवयव असतात तशी सर्व साधने आहेत. 


पण निष्ठा हृदयासारखी आहे. हृदयाशिवाय अवयव शाबूत असून फुकट (व्यर्थ) होतात. निष्ठा वाढवली पाहिजे.


भगवंत सर्वज्ञ आहे व आम्हाला पाहिजे ते तो पुरवतो. अशी आजची आपली निष्ठा आहे.


आम्हाला भगवंताशिवाय सर्व काही हवे आहे. त्या ऐवजी भगवंत हवासा वाटला पाहिजे. त्याकरता अखंड  स्मरण ठेवावे.


भगवंताचे आपण मनाने थोडे झालो तर किती पटीने तो समाधान देईल. तो परमात्मा तसाच दयाळू आहे.पण आमची निष्ठा नाही.


आमची काय कर्तबगारी आहे म्हणून शरण जाऊ नये? परमात्मा कोणत्या रीतीने आवरता (आपलासा करता) येईल? शरणागती शिवाय नाही.


 "मी भगवंताचा आहे म्हणणे" हा परमार्थ. परमात्मा नाचत पुढे येईल.


 आशीर्वाद

  🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २११


परमेश्वर प्रयत्नाला मदत देतो. आळशीपणाला नाही.


आपल्याला केव्हाही भोगता येईल असे सुख परमात्मा देईल (त्याकरता भगवंताला  आवडेल असे आचरण असावे).


आचरण चांगले असलेला भिकारी चांगला. पण आचरण चांगले नसलेला राजा चांगला नाही.


प्रत्येकाला हवी असणारी गोष्ट सहज असणार नाही. कारण ती परिस्थितीवर अवलंबून आहे. ती स्वाधीन करून करून घ्यावी लागेल.


व्यवहारात सहज रहायला शिकावे. आपले मूळ (सहजपणा) बिघडू देऊ नये.


दुसरा कसा वागतो ते पाहू नये, आपण कसे वागले पाहिजे ते पहावे. सर्वांशी ओळख असावी पण अत्यंत मर्यादेने वागावे.


उपाधीरहित व्हायला कर्तव्य करावे. स्मरण राखावे आणि ते राखायला नाम घ्यावे. नामाला सर्वांनी वाहून घ्यावे.


   आशीर्वाद

    🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २१०


आत प्रकाश पडावा वाटतो, प्रचिती मिळावी असे वाटते. आपली मधली अवस्था आहे. साधना आपण चिकाटीने केली पाहिजे.


ज्या परीक्षेची जी पुस्तके (क्षमतेप्रमाणे साधन) आहेत, तीच वाचली पाहिजेत. सतत (नित्यनेम) वाचली पाहिजेत.


त्याच प्रमाणे भगवंताच्या कृपेला योग्य (त्याला आवडेल) तसे सतत वागले पाहिजे, आचरण ठेवले पाहिजे.


स्वतःला सुधारून जग सुधारणे हे विद्वानाचे (ज्ञानी पुरुषाचे) लक्षण आहे.

 

आमचे अपराध भगवंत विसरतो. तो कृपाळु, विसराळु आहे. पण आम्ही आमचे अपराध विसरत नाही.


आजार आला तरी नामात राहिला तर बाधणार नाही. प्रारब्धाचे भोग टळावे असे म्हणणे अन्यायाचे आहे.


सर्वांना दुसर्‍यांना उपदेश करता येतो. तो आचरणात आणला तर परमार्थ होतो.


वस्तुशिवाय समाधान मिळेल तर ते केवळ नामानेच.


आशीर्वाद

🌹🌹🌹

8 May 2025

 🌸  श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २०९


"तुझ्यावाचून कोणी नाही" असे आपण म्हणतो पण भगवंताविना सर्व आपले वाटतात.


जगाची आस सुटली पाहिजे. आपण जग सांभाळून भगवंत पाहिजे म्हणतो.


आपण भगवंताशिवाय दुसरे मागतो. मग दुर्योधनाने वेगळे काय मागितले?


भगवंतावाचून काही न मागणे हे बुद्धीचे काम आहे. पण बुद्धी फसवतेच फार. ती आतली चोर आहे. बुद्धीच अधिक घात करते.


"तू माझा हो" म्हणणे म्हणजे कसेही वागून पांघरुण घाल म्हणणे होय.


भगवंत ज्ञानी आहे. तर मग अमुकच दे असे कां म्हणावे? तो कल्याणाचेच करील ही बुद्धी पाहिजे. हे ओळखून वागणे बुद्धीचे काम आहे.


देहसंबंध हा स्वार्थाचा असतो. तो सोडून (नि:स्वार्थीपणे) वागायला घरापासून सुरवात करावी. देहसंबंधापेक्षा देवाने आणून दिलेला संबंध महत्वाचा आहे.


सर्वांनी प्रेमाने रहावे. प्रेमासारखी वस्तु जगात दुसरी कोणतीही नाही.


भगवंत घरात यायला पाहिजे असेल तर नि:स्वार्थ प्रेम करावे.


आशीर्वाद 

🌹🌹🌹

7 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸

    

    अमृतधारा - २०८


भगवंतावाचून जो आनंद तो खरा नाही. म्हणून प्रपंचात सुखाकरता, आनंदाकरता भगवंतच पाहिजे.


माझ्या आनंदाच्या आड मीच येतो. 


प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म समजून उपयोग करणे हे बुद्धीचे काम आहे. चांगलेपणाचा जो गुणधर्म, तो समजला पाहिजे. जी वस्तू अशाश्वत आहे ती शाश्वत समजणे हा गुणधर्म समजला म्हणावा कसा ?


म्हणून प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म ओळखून वागला तर दुःख नाही (मीठ साखर म्हणून खाल्ले आणि ते खारट लागले तर दुःख होणारच).


देह स्वाधीन नाही. मन स्वाधीन आहे. ते खंबीर ठेवावे. देहाप्रमाणे मनाला पण  विश्रांती पाहिजे. ती नामस्मरणाने मिळते.


घेणारा "मी" ज्यावेळी देणारा होईल त्याच वेळेस स्वत:ला खरा आनंद होईल. जो नि:स्वार्थ बुद्धिने प्रेम करतो त्याला आनंद ख़ास मिळतो.


आशीर्वाद

🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २०७


पैसा हे भाग्य नाही. वैभव नसले पण समाधान असले तर सर्व गोष्टी नसल्या तरी चालेल. 


पैसा नसला तर अडचण नाही. असला तर चालते. पैशावाचून परमार्थ नाही हे म्हणणे खरे नाही.


कशीही अवस्था आली तरी त्यात सुखी नाही व दुःखीही नाही असे पाहिजे.


हल्ली पैसेवाला भाग्यवान म्हणतात. मग निती असो वा नसो.


जेथे भगवंत तो भाग्यवान.


संतांच्या जवळ पैसा नाही, जगाची विद्या नाही पण एक निस्वार्थी प्रेम व समाधान आहे. त्यामुळे ते स्मरले जातात.


मनुष्याला प्राण्यापेक्षा बुद्धीने जगात महत्त्व आहे. म्हणून बुद्धीवानाने समजून नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


   अमृतधारा - २०६


जी गोष्ट आकाराला आली, अगदी रामकृष्णादिकांपासून,  तिला प्रारब्ध आहे. त्या गोष्टी प्रारब्धाप्रमाणे होणारच. 


आपण आपले कर्तव्य निस्वार्थपणाने करावे. मुख्यतः उपासना वाढवावी. रामाचे प्रेम वाढवावे. बाकी आपण काळजी करू नये. ज्याचे तो उत्तम करून घेईल. नाम घेऊन काळजी करणे खरे नाही.


आपण भगवंताच्या मांडीवर दत्तक म्हणून बसल्यावर प्रपंचाची काळजी करू नये.


देवाचे खरे प्रेम नाही म्हणून प्रपंचातील गोष्टींचे प्रेम आहे. प्रपंचातील चांगले वाईटपण, मोठेपण परिस्थितीवर अवलंबून नाही. आपल्या आचरणावर अवलंबून आहे.


आचरण सांभाळणे ही कर्तबगारी आहे. त्यात स्मरण ठेवावे. या दोहोत समाधान आहे.


कर्तव्याला चुकू नये व निष्ठा कमी होऊ देऊ नये.


आशीर्वाद

🌹🌹🌹

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २०५


मला व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो म्हणून मी धर्म वाईट म्हणतो. धर्म सांभाळून होईल तितका व्यवहार करणे, पाळणे जरूर आहे. पण तसे जमत नाही म्हणून धर्म वाईट म्हणू नये.


वाईट माणसाला चांगली गोष्ट वाईट अशी वाटत नाही. फक्त तो ते आचरीत नाही.


धर्म व नीतीचे आचरण हे जमीन नांगरून तयार केल्यासारखे आहे. त्यात बी मात्र चांगले पाहिजे. ते "नाम" पाहिजे.


नाम नामाकरताच घ्यावे. नाम कशासाठी (उद्देशासाठी) घेतले तर गाय देऊन गाढव घेतल्यासारखे होईल.


नामाकरता नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा पाऊस पडेल.


झाडाच्या मुळाला पाणी  घातले की त्याच्या सर्व भागांना पोहचते; तसे भगवंताचा विसर न पडू  दिला तर सर्व काही होते.  म्हणून सतत नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

3 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


     अमृतधारा - २०४


भगवंताची भूक (प्राप्तीची तीव्र इच्छा) लागली पाहिजे. त्याला कर्ममार्गाची जरूर आहे.


कर्ममार्गाला सोडायला सांगितले नाही. पण त्याला चिकटूनही रहायला सांगितलेले नाही (सुवर्णमध्य साधायला हवा).


भगवंताला साक्षी ठेवून कर्म करणे हे पुण्य, तर त्याला विसरून केलेले कर्म ते पाप आहे.


केलेले कर्म नाहीसे करण्याकरता धर्माचरण सांगितले आहे, अजीर्णाकरता जसे गोळी खाणे तसे.


धर्माला वाईट म्हणू नये. आचाराला सर्व शक्य नाही  म्हणून वाईट म्हणू नये. मला तसे वागता (धर्माचरण करता) येत नाही हा माझा कमीपणा आहे.


भगवंताच्या साक्षीने कर्म करावे. त्यासाठी त्याचे अखंड स्मरण पाहिजे व त्याला "नाम" हेच उत्तम साधन आहे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

2 May 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - २०३


प्रपंच आडवळणाचा आहे. वारा येईल तशी पाठ द्यावी. त्याला तसे वळण द्यावे. प्रपंचात उंच-सखोलपणा आहे. कोणतीही परिस्थिती कायम रहात नाही.


माणसाने काढलेला रस्ता सुद्धा उंच-सखल असतो. मग प्रारब्धाचा रस्ता कसा साधा असेल?


प्रपंचात पैशा इतकीच धीराची गरज आहे. लोकांचा पैसा (लाॅटरी, लाच) त्याच्या वासनेसह येतो. तो अत्यंत हानीकारक असतो.


आपण प्रपंचाकरता नवस केला व देवाने दिला नाही तर देवाला देवपण नाही म्हणतो, म्हणजे थोडी तरी श्रद्धा जाते. 


मिळाले नाही तर श्रद्धा कमी न व्हावी. भगवंताच्या इच्छेवर ठेवावे. परमार्थ सरळ आहे. तो सरळ करावा. 


निस्वार्थपणाने प्रेम करणे म्हणजे परमार्थ.


आशीर्वाद.

🌹🌹🌹